परमहंस श्री सिध्दारूढ स्वामी - अल्पपरिचय

परमहंस श्री सिध्दारूढ स्वामी - अल्पपरिचय
निजाम राज्यातील वंशदुर्ग या गांवी गुरुशांतप्पा आणि देवमल्लम्मा असे एक सुशील जोडपे रहात असे. त्यांनी संततीच्या अभावी कित्येक वर्षे शिवाराधना केली. त्यानंतर त्यांना तीन पुत्र झाले. पहिला वृद्धप्पा, दुसरा मध्वप्पा आणि तिसरा सिद्धप्पा अशी त्यांची नांवे होत. सिद्धप्पा हेच पुढे “सिद्धारूढ महाराज” या नांवाने प्रसिद्धीस आले.
शांतप्पांचे घरी कुलगुरु वीरभद्रय्या यांचे रोज अध्यात्मविषयावर निरूपण होत असे. हे जोडपे नियमित श्रवणार्थ बसत असे. त्यांच्याबरोबर सिद्धप्पा ही अत्यंत आवडीने श्रवणास बसत. सिद्धप्पांना जसजसे कळू लागले, तसतसे ते निरूपणानंतर वीरभद्रय्यांना गूढ वाक्यांचा अर्थ अत्यंत कुतूहलाने विचारीत आणि ते त्याचा अर्थ सिद्धप्पांना समजेल अशा भाषेत समजावून सांगत असत.
एके दिवशी सिद्धप्पांना, ” आपण सदगुरूला शरण जाऊन शक्यतो लवकर आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे ” अशी तीव्र तळमळ लागली. त्यामुळे कोणासही न कळत सदगुरूंच्या शोधार्थ ते घरातून बाहेर पडले. फिरत फिरत हैद्राबाद, गोवळकोंडा या रस्त्याने जाऊन तिमिरलंकेच्या एका गुहेत गुरूप्राप्ती साठी त्यांनी काही दिवस घालविले.
तेथे दृष्टांतात एका साधूने सांगितल्यावरून, गुंटकल जवळ असलेल्या अमरगुड्ड या गांवचे मठाधिपती जे गजदंडस्वामी यांच्या दर्शनास ते गेले. तेव्हां सिद्धप्पांना उद्देशून किंचित रागाचा आव आणून स्वामी, ”कोण आहेस रे तू? वाटेवर का उभा राहिलास ? बाजूला हो” असे म्हणाले. तरी गुरूंच्या या बोलण्याने सिद्धप्पांचे मन किंचित देखील खिन्न झाले नाही. उलट गुरूंच्या वाणीने आपल्या कानावाटे प्रवेश करून आज आपणास पवित्र केले असे वाटून त्यांना अत्यंत आनंद झाला.
सिद्धप्पांची भूमिका पक्की असल्याचे जाणून गजदंडस्वामींनी त्यांस मठात राहण्याची आज्ञा केली. सिद्धप्पा रोज दोनप्रहरी स्वतः पांच घरी भिक्षा मागून आणून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. ते रोज प्रातःकाळी उठून स्वामींच्या घोडयाचा तबेला झाडून साफ करणे, सडासंमार्जन करून मठाचे अंगण स्वच्छ ठेवणे, रानातून लाकडे आणून पाणी तापवून स्वामींच्या स्नानार्थ नेऊन देणे, स्वयंपाक–पाण्याची भांडी घासून स्वच्छ ठेवणे, स्वामींची व इतर शिष्यांचीही वस्त्र धुणे इत्यादी सेवा करीत असत.
सिद्धप्पांची वैराग्य वृत्ती तसेच आपलेपणाने व निरभिमानपणाने केलेली सेवा पाहून, गजदंडस्वामींनी एके दिवशी सिद्धप्पांना जवळ बोलावून दृढ आलिंगन दिले आणि प्रमाणखूण सांगितली. पुढे कांही दिवसानंतर गजदंडस्वामी म्हणाले, “आजपासून तुझे नांव ´सिद्धारूढ´ असे मी ठेवले आहे. यापुढे तू तुला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा विनियोग अज्ञ जनांस बोधामृत पाजून त्यांचा उद्धार करण्याकडे कर.”
त्यांनतर गुरूंचा निरोप घेऊन सिद्धारूढ तीर्थाटनास निघाले. ते अनेक छोटी मोठी तीर्थे हिंडून शेवटी हुबळी या गांवी आले. तेथे त्यांनी स्वतःकरीता एकांतवासासाठी तोरवीवापी नजिकची जागा पसंत केली. त्या स्थानी ते सदा ब्रह्मचिंतनात निमग्न होऊन राहू लागले.
एका पहाटेला सिद्धारूढ ध्यानस्थ बसलेले पाहून एका वाटसरूने त्यांच्या मस्तकावर जळती गोवरी ठेवून दिली. थोड्या वेळाने त्या वाटेने जाणाऱ्या एका इसमाने गोवरी खाली काढून टाकली आणि तो म्हणाला, `महाराज` ही करणी कोणाची हे मी जाणतो. आपण कृपा करून आज्ञा कराल तर त्या दुष्टाची मी चांगलीच फजिती उडवीन` तेव्हां सिद्धारूढ म्हणाले, “शरीरास जे सुख किंवा दु:ख होते, ते प्रारब्धानुसार असल्याने भोगूनच सारले पाहिजे. त्याशिवाय त्या कर्माचा क्षय होत नाही. जर त्याच्या निवारणार्थ प्रयत्न केला तर त्याची संचित कर्मात भर पडून ते पुनर्जन्मास कारणीभूत होते. करिता, साधकाने दुसर्याने दिलेल्या सुखदु:खाची पर्वा न करता ते निमूटपणे भोगण्यास तयार असले पाहिजे. मला तर वाटते की, आज माझ्या मस्तकावर शिवाने आपला तृतीय नेत्र ठेविला आहे. करिता त्याचे निवारण करण्याची माझी इच्छा नाही” त्यावर तो वाटसरू तेथून पुढे निघाला.
त्यानंतर ते डुमगेरी कटट्यावर जाऊन बसू लागले. त्यांच्या दैवी सामर्थ्याने आकर्षित झाल्यामुळे त्यांच्या दर्शनास आसपासचे, खेड्यापाड्याचे, गांवचे, परगांवचे लोक झुंडीच्या झुंडी येऊ लागले. पुढे प्रमुख भक्तमंडळींनी स्वामींच्यासाठी एक आश्रम आणि पिण्यासाठी व स्नानासाठी अशी दोन तळी बांधविली. त्याचप्रमाणे लोकांना उतरण्यासाठी धर्मशाळा बांधविण्यात आल्या. त्यानंतर भोजनशाळा, पाकशाळा बांधून त्या ठिकाणी मोठमोठया चुली व मोठमोठी भांडी पण ठेवण्यात आली.
त्यावर प्रतिवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव होऊ लागला. त्या सात दिवसात अहोरात्र ”ॐ नमः शिवाय” या मंत्राचा घोष चाले. पहिल्या प्रहरी महाराजांची काकड आरती करीत. दोनप्रहरी संतर्पण होई. तिसऱ्या प्रहरी भक्तमंडळींचे गायन, वादन, कीर्तन, प्रवचन होई. चौथ्या प्रहरी कांही अधिकारी मंडळींची महाराजांच्या सान्निध्यात बसून आत्मचर्चा चाले. पांचव्या प्रहरी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढीत. महाराज शयनगृहात गेले म्हणजे भक्तगण शयनगृहाच्या भोवती प्रदक्षिणा घालीत असत. याप्रमाणे सात दिवसांचा कार्यक्रम चाले.
ज्यांनी ज्यांनी दान करण्याची इच्छा दर्शविली असेल त्या सर्वांना महाराज उत्सवाचा आठवा दिवस ठरवून देत असत. त्याप्रमाणे खेडयापाडयाचे लोक त्या दिवशी भात, आमटी, भाकरी, भाजी तयार करून बैलगाडीतून आणीत. ते अन्न आश्रमातील सेवेकरी, गोरगरीब, बावा, बैरागी, आंधळ्यापांगळ्यांना देऊन तृप्त करीत असत. रात्री महाराजांना रथात बसवून भक्तमंडळी रथोत्सव करीत.
रामनवमीच्या दिवशी भक्तमंडळी महाराजांना पाळण्यात बसवून त्यांचा जन्मोत्सव करीत. तसेच श्रावण पौर्णिमेच्या रात्री तळ्याभोवती पणत्या लावून महाराजांना नावेत बसवून उत्सव करू लागले. त्याही पुढे दर सोमवारी प्रदोषकाळी महाराजांना कैलासमंडपात उच्चासनी बसवून, रत्नजडित किरीट व सर्व अलंकार लेववून त्यांची षोडशोपचारे पूजा करून भक्तमंडळी मंत्रघोषाने पुष्पांजली अर्पण करीत असत. महाराजांची कीर्ती दूरवर पसरल्यामुळे, सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांच्या दर्शनाला लोकांची सारखी गर्दी होई. त्यांनी असंख्य लोकांचा उद्धार केला आणि इ.स. १९२९ मधील श्रावण वद्य प्रतिपदेच्या पहाटेला चार वाजता समाधी घेतली. सात दिवस आधीपासून त्यांनी निराहार व एकांत पत्करला होता. समाधी घेतल्याची वार्ता समजताच चहुंकडून भक्तमंडळी मठात येऊन हजर झाली. त्यासमयी धगधगीने होरपळून गेलेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे भक्तमंडळींच्या मुद्रा खिन्न व उदास दिसू लागल्या.
महाराजांच्या पुण्यमय देहाचे एकवार शेवटचे दर्शन घडावे, अशी भक्तमंडळींनी इच्छा दर्शविल्यावरून प्रमुख भक्तमंडळींनी महाराजांचा पार्थिव देह शृंगारून कैलासमंडपात बसवून आबालवृद्धांना दर्शन घेण्याची सोय केली. हा दर्शनसमारंभ दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत चालला होता. त्यानंतर महाराजांचा पुण्यमय देह हत्तीवर अंबारीत बसवून त्याची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या बरोबर दोन मैलापर्यंत जनसमूह भजन करीत चालला होता. दुपारी तीन वाजता निघालेली मिरवणूक गांवभर मिरवून रात्री नऊ वाजता परत मठाकडे येऊन पोहोचली.
समाधी घेण्यासाठी म्हणून बरीच वर्षे आधी महाराजांनी मंदिर बांधून ठेविले होते. त्यामध्ये महाराजांचा पुण्यमय देह ठेवून त्यावर भस्म, सुवर्ण, चांदी, सुवासिक द्रव्ये इत्यादी वाहून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून ती जागा बंद करण्यात आली. त्याक्षणापासून समाधीसमोर अखंड नामस्मरण सुरू करण्यात आले.
दुसर्या दिवशी भक्तमंडळी आपापल्या गांवी जाण्यास निघाली. त्या समयी महाराजांच्या आठवणीने सर्वांची अंतःकरणे भरून डोळ्यावाटे अश्रुधारा वाहू लागल्या. शेवटी महाराजांचे गुणवर्णन करीत सर्वजण अतिशय जड अंतःकरणाने मठातून जाते झाले. पुढे कांही दिवसानंतर समाधीच्या जागी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला.
|| सब संतन की जय ||